Gulabrao Patil : राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई वगळता अनेक ठिकाणी महायुतीतील नैसर्गिक युतीचा दावा करणारे पक्ष एकमेकांविरोधात मैदानात उतरले असून, जळगाव जिल्ह्यातही राजकीय समीकरणे तापताना दिसत आहेत. अशातच शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाचोरा येथे केलेल्या मिश्कील वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.
पाचोरा येथील एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “मी सरकारमध्ये आहे, त्यामुळे मला सर्वांशी जपून बोलावं लागतं. मला सगळ्यांनाच ‘I Love You’ करावं लागतं.” त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुढे बोलताना त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावरही टोले लगावले. “किशोर पाटील यांना सूट आहे म्हणून ते दंड थोपटत आहेत. ते पूर्वी पोलीस होते, आमदाराच्या मागे पिस्तूल घेऊन उभे राहिले असते. नशिबाने तेही आमदार झाले,” असे म्हणत त्यांनी मिश्कील शैलीत टिप्पणी केली.
धरणगावच्या राजकारणावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “धरणगावची सत्ता माझ्याकडे २५ वर्षे होती, ती गेली म्हणजे कायमची गेली असे नाही. ती सत्ता पुन्हा येईल.” नगरसेवकांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, निवडून आल्यानंतर काही जणांमध्ये माज येतो. “दोन मोबाईल, चार माणसं आणि हवा, एवढ्यावर नगरसेवक थांबू नये. आलेल्याशी गोड बोला, काम झालं नाही तरी वागणूक चांगली ठेवा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
युतीबाबत बोलताना गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाचे संकेत दिले. “निवडणूक संपली की विरोध संपतो, आपण सर्वांचे असतो. विरोधक जरी आले तरी त्यांना पाणी पाजा,” असे सांगतानाच त्यांनी आमदार किशोर पाटील यांना उद्देशून, “तुम्ही तुमच्या मतदारसंघात भाजपसोबत युती करणार नाही, हे मला माहीत आहे,” असे थेट वक्तव्य केले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीची शक्यता धुसर असल्याचे संकेत मिळत आहेत.
नगरपरिषद निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांनी भाजपसोबतची युती तोडून स्वतंत्र लढत दिली होती. पाचोरा आणि भडगाव या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा थेट सामना भाजपशी झाला आणि दोन्ही ठिकाणी भाजपचा पराभव करत शिवसेनेने सत्ता मिळवली. याच पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांतही युती होणार नसल्याचे संकेत गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील तीस वर्षांपूर्वीचा एक खास किस्साही सांगितला. “नगरसेवक झाला की तो ऐकत नाही, माझाही तसाच अनुभव होता,” असे सांगत त्यांनी १९९६ मधील धरणगाव नगराध्यक्ष निवडीची आठवण सांगितली. “पैसे नसल्याने नगरसेवकांना घेऊन आम्ही झुरखेड्याला पळून गेलो होतो. सोळा दिवस एका कार्यकर्त्याच्या राजवाड्यात राहिलो आणि नंतर नगराध्यक्ष बसवला,” असा किस्सा सांगत त्यांनी नगरसेवकांचे महत्त्व अधोरेखित केले.
शहरातून आमदार किशोर पाटील यांना १५ हजार मताधिक्य कसे मिळेल, यासाठी नगरसेवकांनी काम करावे, असे आवाहन करत गुलाबराव पाटील यांनी आपले भाषण संपवले.


