Pune Accident : पुणे शहरातील वाढती वाहतूक समस्या पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात समोर आली असून कात्रज–कोंढवा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असल्याचं चित्र आहे. गेल्या साडेचार वर्षांत या मार्गावर २५ पेक्षा जास्त जणांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. आज सकाळी घडलेल्या आणखी एका भीषण अपघातात एका महिला शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी इस्कॉन चौकाच्या पुढे, हनुमान मंदिराजवळ हा अपघात घडला. दुचाकीवरून प्रवास करत असताना एका कंटेनरच्या चाकाखाली सापडल्याने महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. रमा कापडी (वय ५३, रा. कात्रज–कोंढवा रोड) असं मृत शिक्षिकेचं नाव असून त्या जे.एस.पी.एम. संस्थेत अध्यापन करत होत्या.
हेही वाचा – Beed Accident: बीडच्या मांजरसुबा घाटात भीषण अपघात! डिझेलचा टँकर पलटी झाल्याने मोठा स्फोट
वाहतूक मार्गात बदल झाल्याने अपघात?
रमा कापडी यांच्या पतीचं १५ वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्या आई आणि मुलीसोबत राहत होत्या. आईच्या अपघाती मृत्यूनंतर आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मुलीसमोर उभा राहिला आहे. या अपघातामागे आज शहरात असलेली विशेष परिस्थितीही कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. कोंढवा रोडवर आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता. रस्ता तळ्याजवळून वळवण्यात आल्यामुळे अचानक बदललेला मार्ग लक्षात न आल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप केला जात आहे.
हेही वाचा – Sangli News: चारच महिन्यांपूर्वी लग्न अन् ट्रॅक्टर उलटून तरुण ठार; मदतीसाठी गेलेल्या रूग्णवाहिकेचा अपघात
अपघातात शिक्षिकेचा मृत्यू
या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते वसंत मोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या रस्ता बदलामुळेच हा अपघात झाला असून त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, कात्रज-कोंढवा रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून सुरू असून अद्याप ते पूर्ण झालेलं नाही. अपूर्ण काम, अरुंद मार्ग, अवजड वाहनांची वर्दळ आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे या रस्त्यावर यापूर्वीही अनेक गंभीर अपघात झाले आहेत. आज सकाळी साडेसातच्या सुमारास खडी मशीन चौकाकडून कात्रजच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. वाहतूक कोंडीमुळे वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


