पुणे : मुंढवा आणि बोपोडी जमीन घोटाळा प्रकरणात नाव आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले पुत्र पार्थ पवार यांची स्पष्टपणे पाठराखण केली. “कोणताही व्यवहार करण्यापूर्वी तज्ज्ञ वकिलांकडून अभ्यास करायला हवा. मुंढव्यातील जमीन व्यवहारात ही खबरदारी घेतली नाही. मला याबाबत माहिती असते तर मी हा व्यवहार होऊ दिला नसता,” असे अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहाराबाबत बोलताना ते म्हणाले, “एक रुपयाचीही देवाणघेवाण झालेली नाही. विक्रेत्याला पैसे दिलेले नाहीत, जमिनीचा ताबा घेतलेला नाही. मात्र, खरेदीखत करायला नको होते. ते कसे झाले, हे मला माहिती नाही. हे आश्चर्यकारक आहे. चौकशी समितीच्या अहवालातून सत्य समोर येईल, असं अजित पवार म्हणाले.
“या प्रकरणामुळे विरोधकांच्या निशाण्यावर आलेल्या पार्थ पवार यांच्याबाबत अजित पवार म्हणाले, “हे प्रकरण उघड झाल्यापासून मी अद्याप पार्थला भेटलो नाही. उद्या त्याच्याशी बोलणार. कितीही विश्वासू लोक असले तरी असे व्यवहार तज्ज्ञांशी चर्चा करूनच करायचे असतात. चार पैसे गेले तरी चालतील. शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो. पार्थ यापुढे काळजी घेईल, असंही पवार यांनी म्हटले.
मुंढवा आणि बोपोडीतील जमीन शासकीय असल्याने नोंदणी अधिकाऱ्यांनी व्यवहार थांबवायला हवा होता, असेही त्यांनी नमूद केले. प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असून, उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. ही समिती भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करेल, असे अजित पवार यांनी सांगितले.
“मी नियमाने काम करणारा कार्यकर्ता आहे. आतापर्यंत माझ्यावर अनेक आरोप झाले, पण सिद्ध झाले नाहीत. मात्र, बदनामी झाली. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे, माझा कितीही जवळचा नातेवाईक असला तरी नियमाबाहेर काम करू नका,” असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.


