पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘डिटवाह’ चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवत असून आज (२९ नोव्हेंबर) राज्यात आकाश ढगाळ राहील आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. उद्या (३० नोव्हेंबर) पहाटेपर्यंत हे वादळ उत्तर तमिळनाडू-दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकेल, त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात रिमझिम पावसाची शक्यता कायम आहे.
मुंबई आणि पुण्यात किमान तापमानात काही अंशांची घट झाली असली तरी आज आणि उद्या रात्रीच्या तापमानात पुन्हा १-२ अंशांनी वाढ होईल, असे हवामान विभागाचे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. मात्र ही वाढ तात्पुरती असून १ डिसेंबरपासून वातावरण पूर्वपदावर येईल आणि खरी गुलाबी थंडी जाणवू लागेल.
पुढील तीन-चार दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. सध्या विदर्भात भंडारा येथे राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते, तर बहुतांश ठिकाणी किमान तापमान १४ अंशांवर पोहोचले आहे. कमाल तापमान मात्र अजूनही ३०-३५ अंशांच्या आसपास आहे. कोकणातील डहाणूत शुक्रवारी ३५.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली.
सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिक हैराण झाले असून सर्दी-खोकला, ताप असे आजार वाढले आहेत. १ डिसेंबरनंतर मात्र थंडीचा जोर वाढणार आहे.


