पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला पुण्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील तरुण आणि लोकप्रिय नेते अतुल देशमुख हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ते लवकरच शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेणार आहेत. यामुळे शिंदे गटाची उत्तर पुणे जिल्ह्यातील ताकद वाढेल आणि राष्ट्रवादीला आणखी एक मोठा फटका बसणार आहे. ही राजकीय हालचाल जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर घडत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अतुल देशमुख हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादीत तुतारी फुकणारे नेते म्हणून ओळखले जातात. आता ते धनुष्यबाण स्वीकारून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यात तरुणांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले जाते.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली असून, पक्षांतर्गत दुफळीमुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या प्रवेशाने शिंदे गटाला उत्तर पुणे जिल्ह्यात मजबूत नेतृत्व मिळेल आणि नवे राजकीय समीकरण घडवणारी ही घटना ठरणार आहे.
तीन जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला हा धक्का एकटाच नाही. नुकतेच १५ ऑक्टोबरला बुलढाणा, हिंगोली आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांनी अचानक पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पक्षाला मोठा फटका बसला आहे. हे नेते राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही शरद पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिले होते.
मात्र, आगामी निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी तडकाफडकी ‘जय महाराष्ट्र’ करत पक्ष सोडला. हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, बुलढाण्याच्या जिल्हाध्यक्षा रेखे खेडेकर आणि अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके या तिघांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीची पायाभूत रचना हादरली आहे. या राजीनाम्यामुळे पक्षाच्या स्थानिक पातळीवरील संघटना कमकुवत झाली असून, शरद पवार गटाला सतत धक्के बसत आहेत.


