Weather Alert : राज्यात एकीकडे तीव्र उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सुरूच आहे. अशातच हवामान विभागाने विदर्भासाठी महत्त्वाचा हवामान इशारा जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना उष्णतेसोबतच पावसाचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे.
अमरावतीत पाणीपुरवठा बंद
दरम्यान, अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील तब्बल १८.८१ कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याने कंत्राटदार संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. त्याचा परिणाम म्हणून अमरावती शहरासह ३५४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी आणि चिखलदरा शहरांनाही याचा फटका बसला आहे.
गोंदियात अवकाळी पावसाने धान पिकाचे नुकसान
गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारे, गारपीट आणि पावसामुळे रब्बी हंगामातील धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ३ हजार शेतकऱ्यांच्या १४७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाकडून पंचनामे सुरू असून शासनाकडे नुकसानभरपाईचा अहवाल पाठवण्यात येणार आहे.
मान्सूनबाबत दिलासादायक बातमी
IMD च्या अंदाजानुसार, ६ जूनपर्यंत कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांमध्ये मान्सून पोहोचण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तर ३१ मेपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


