Monsoon Update : महाराष्ट्रातील हवामानात हळूहळू बदल होत असून जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र हा पाऊस मान्सूनपूर्व स्वरूपाचा असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, राज्यात मान्सूनचे आगमन किमान १० जूनपर्यंत होण्याची शक्यता कमी आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. तसेच कोकण किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मे महिन्याच्या तुलनेत तापमानात काहीशी घट होणार असली तरी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे राहू शकते.
सध्या पडणाऱ्या पावसाचा मान्सूनशी थेट संबंध नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मान्सूनच्या प्रगतीवर लक्ष ठेवूनच पुढील कृषी निर्णय घ्यावेत, असे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली, वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर किंवा टिनशेडजवळ थांबू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.
दरम्यान, शनिवारी मुंबईसह राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील डिस्कळ, ललगुण आणि बुध परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले. अचानक झालेल्या या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.


