Maharashtra Kesari : राज्यातील कुस्तीप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना आज संध्याकाळी रंगणार असून विजेत्याला मानाची गदा प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
अनेक अटीतटीच्या लढतींनंतर अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. माती विभागात सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. तर गादी विभागात सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अंतिम लढतीत प्रवेश केला आहे.
गादी विभागात जय पाटीलने साताऱ्याच्या दिग्विजय जाधववर एकतर्फी १०-० असा विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. त्याआधी अकोल्याचा सिद्धांत गवई गैरहजर राहिल्याने पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ याला वॉकओव्हर मिळाला.
दरम्यान, स्पर्धेतील मोठा उलटफेर ठरलेली लढत म्हणजे नांदेडच्या शिवराज राक्षे आणि कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांच्यातील सामना. या रंगतदार लढतीत पृथ्वीराज पाटीलने १०-६ असा विजय मिळवत शिवराज राक्षेला स्पर्धेबाहेर केले.
आता माती आणि गादी विभागातील विजेते आमनेसामने येणार असून ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी अंतिम निर्णायक लढत रंगणार आहे. या थरारक सामन्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यंदाची मानाची गदा नेमकी कोणाच्या खांद्यावर जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


