Monsoon Update : देशभरातील उकाड्याच्या पार्श्वभूमीवर मान्सूनबाबत दिलासादायक अपडेट समोर आली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत नैऋत्य मान्सून अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांच्या काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १६ मेच्या आसपास दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकते. यासोबतच ईशान्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज
तामिळनाडू
पुद्दुचेरी
केरळ
दक्षिण कर्नाटक
ईशान्य भारतातील अनेक राज्ये
१३ ते १९ मे दरम्यान ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत ताशी ५० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचेही IMD ने म्हटले आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. दुसरीकडे उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. राजस्थानातील बारमेर येथे देशातील सर्वाधिक ४८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
महाराष्ट्रात मान्सून कधी?
३१ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो
५ जूनला गोव्यात आगमन
६ जूनपर्यंत कोकणात प्रवेश
७ जूनपर्यंत पुण्यात मान्सून पोहोचण्याची शक्यता
विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ तयार झाले नसल्याने मान्सूनचा प्रवास सुरळीत होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


