परभणी : कीर्तन संपवून घरी परतत असताना परभणी-जिंतूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन वारकरी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मराठवाड्यातील वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. दत्ता महाराज कऱ्हाळे, माऊली महाराज कदम आणि प्रसाद महाराज कदम यांचा या अपघातात प्राण गेला.
ही घटना झरी गावाजवळ लोअर दुधना डाव्या कालव्याच्या परिसरात मध्यरात्री १ ते २ वाजताच्या सुमारास घडली. तिघेही महाराज परभणीतील पिंपळा येथे कीर्तन आटोपून दुचाकीने आपल्या गावी बोर्डीकडे जात असताना समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघेही गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शंकर हाके यांनी जखमी महाराजांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिघांनाही मृत घोषित केले.
मयत वारकऱ्यांमध्ये हभप. माऊली दिगंबरराव कदम (३०, रा. बोर्डी, ता. जिंतूर), हभप. प्रसादराव कदम (४५, रा. बोर्डी, ता. जिंतूर) आणि हभप. दत्ता माणिकराव कऱ्हाळे (३०, रा. मुडा, ता. जिंतूर) यांचा समावेश आहे.
ही दुःखद बातमी समजताच बोर्डी व परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली असून, वारकरी संप्रदायातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.


