सांगली : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तरासारखी झाली आहे,” अशी बोचरी टीका करत त्यांनी भाजपच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जयंत पाटील यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भाजपवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले, “पिंजरा चित्रपटात मास्तराला तमाशाचा नाद लागतो आणि शेवटी तोच तुणतुणे हातात घेऊन पुढे उभा राहतो. आज भाजपची अवस्था तशीच झाली आहे.” यावेळी त्यांनी शायरीच्या माध्यमातून भाजपला टोला लगावला. “ये बंद करने आये थे तवायफो की कोठी, मगर सिक्को की खनक देख कर खुद मुजरा कर बैठे,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर सडकून टीका केली.
अकोल्यात भाजपने एमआयएमसोबत केलेल्या युतीवरही जयंत पाटील यांनी सवाल उपस्थित केले. “भाजप स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतो, पण सत्तेसाठी अकोल्यात एमआयएमसोबत युती करतो. ओवैसींच्या मांडीला मांडी लावून बसतो. यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “सत्तेसाठी भाजप कुणाशीही आघाडी करायला मागेपुढे पाहत नाही. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारा भाजप आज स्वतःच काँग्रेसमुक्त झाल्याचे चित्र दिसत आहे.” जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.


