पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटी गावातील रामराव वालेगावकर आणि सुशिलाबाई वालेगावकर या दांपत्याला विशेष महापूजेचा मान मिळाला. तसेच, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी आणि देवडे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापूजेस उपस्थित राहण्याचा बहुमान लाभला.
मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे सहा लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. महापूजेनंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल चरणी साकडे घातले की, “राज्यावर आलेले नैसर्गिक संकट लवकर दूर होऊ दे, बळीराजा सुखी-समाधानी राहू दे. शेतकरी, वारकरी आणि लाडक्या बहिणींच्या जीवनात सुख-समाधान व आनंदाचे दिवस येतील, सर्व अरिष्ट दूर होतील आणि महाराष्ट्र सर्व क्षेत्रांत अव्वल ठरेल.”
शिंदे यांनी पंढरपूरला येण्याचे वेगळे समाधान असल्याचे सांगितले. राज्य सरकारने संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले असून, कर्जमाफी उपाययोजनांबाबत एप्रिलमध्ये शिफारस येईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच, पंढरपूरची पवित्र चंद्रभागा नदी, वारकऱ्यांची गंगा कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, नगर विकास खात्याने यासाठी १२० कोटी रुपयांचा पहिला टप्पा मंजूर केला आहे. यातून शहरातील ड्रेनेज आणि मिश्रित पाण्याची समस्या सोडवली जाईल.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत विकासाच्या जोरावर महायुतीला जनतेचा पाठिंबा मिळेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.


