Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते समरजीत घाटगे यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
समरजीत घाटगे आज मुंबईत रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत.
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मध्ये प्रवेश केला होता. मात्र अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये ‘घरवापसी’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
समरजीत घाटगे यांनी कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. भाजपमध्ये जाण्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “माझा भाजपप्रवेश काही दिवसांपासून प्रलंबित होता.
कार्यकर्त्यांचा कल भाजपकडे असल्याने आणि पक्ष नेतृत्वाशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला.” तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आदर व्यक्त करत “त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळणार याचा आनंद आहे,” असेही त्यांनी म्हटले. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


