सोलापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोलापूर येथील समर्थ सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लादले आहेत. बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 35(अ) आणि 56 अंतर्गत, बँकेच्या व्यवहारांवर पुढील सहा महिन्यांसाठी कडक बंधने घालण्यात आली आहेत. या निर्बंधांमुळे बँकेला RBI च्या परवानगीशिवाय नवीन कर्ज देणे, ठेवी स्वीकारणे किंवा मालमत्ता विक्री/हस्तांतरण करणे शक्य होणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बँकेच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासही पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
मात्र, ठेवीदारांना दिलासा देताना RBI ने स्पष्ट केले आहे की, DICGC योजनेअंतर्गत ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण मिळू शकते.
समर्थ सहकारी बँकेने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करत आपली भूमिका मांडली आहे. बँकेने गेल्या तीन महिन्यांत लक्षणीय प्रगती केल्याचा दावा केला असून, सभासदांचे भागभांडवल दुप्पट झाल्याचेही सांगितले आहे. बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी RBI शी सतत संपर्कात असून, ही बंधने लवकरात लवकर उठतील, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी व्यक्त केला आहे.


