छत्रपती संभाजीनगर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या ३५ उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेत निवडणूक याचिका सादर केल्या आहेत. विधानसभा २०२४ च्या निवडणुकीमध्ये निकाल लागल्यानंतर पराभूत उमेदवारांनी जे आक्षेप घेतले होते, तक्रारी केल्या होत्या, त्याबाबत निवडणूक आयोगाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जवळपास ३५ पराभूत उमेदवारांनी निवडणूक याचिका सादर केल्या आहेत.
त्यामध्ये कैलास गोरंट्याल (जालना) यांनी अर्जुन खोतकर यांच्याविरोधात याचिका केली. सर्जेराव मोरे (लातूर) यांनी रमेश कराड यांच्या विरोधात, प्रवीण चौरे यांनी मंजुळा गावित यांच्याविरोधात, महेबुब शेख (आष्टी, जि. बीड) यांनी सुरेश धस यांच्याविरोधात, राजेश टोपे (घनसावंगी) यांनी हिकमत उढाण यांच्याविरोधात, राम शिंदे (कर्जत) यांनी रोहित पवार यांच्याविरोधात, राजू शिंदे (छ. संभाजीनगर पश्चिम) यांनी संजय शिरसाठ यांच्याविरोधात याचिका केली आहे. पृथ्वीराज साठे (केज) यांनी नमिता मुंदडा यांच्याविरोधात, बबलू चौधरी (बदनापूर) यांनी नारायण कुचे यांच्याविरोधात, चंद्रकांत दानवे (भोकरदन) यांनी संतोष दानवे यांच्याविरोधात, बाळासाहेब थोरात (संगमनेर) यांनी अमोल खताळ पाटील यांच्याविरोधात, सतीश पाटील (पारोळा) यांनी अमोल पाटील यांच्याविरोधात याचिका सादर केल्या आहेत.
ईव्हीएमवर व्यक्त केला संशय
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी अनेक गैरप्रकार झाले. ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे आरोप करून याबाबत निवडणूक आयोगाकडे सर्वच उमेदवारांनी तक्रारी केल्या. त्याचप्रमाणे व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीची मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक निकालानंतर याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने मोठ्या प्रमाणावर या याचिका दाखल झाल्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. व्ही. डी. सोळुंखे, संभाजी टोपे, सिद्धेश्वर ठोंबरे, विजय लटंगे, रवींद्र गोरे, सुश्मिता दौड, मुकुल कुलकर्णी, ज्ञानेश्वर बागुल, के, बी. धोंगडे, विक्रम धोर्डे आदींनी काम पाहिले.


