नवी दिल्ली: लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध विजयाच्या अगदी जवळ पोहोचलेल्या टीम इंडियाला २२ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात इंग्लंडचा एक धोकादायक प्लॅन समोर आला आहे, जो त्यांनी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्ध केला होता, कारण बुमराह आणि रवींद्र जडेजा सामन्याच्या पाचव्या दिवशी नवव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला विजयाकडे घेऊन जात होते. यामुळे इंग्लंडचा कॅम्प संतापला आणि कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांनी बुमराहला जखमी करून सामना जिंकण्यासाठी धोकादायक योजना आखली. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने हा खुलासा केला आहे.
मोहम्मद कैफने केला दावा
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना दावा केला की, लॉर्ड्स कसोटी सामन्यात १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बुमराह आणि जडेजाने नवव्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी करून इंग्लंडची चिंता वाढवली होती. यावेळी यजमान संघाने जाणीवपूर्वक बुमराहवर बाऊन्सरचा वर्षाव करून त्याला जखमी करण्याचा कट रचला.
कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांना विश्वास होता की, जर ते बुमराहला बाद करू शकले नाहीत तर ते मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीपूर्वी किमान त्याला दुखापत करू शकतात. बुमराहने दुसऱ्या डावात 54 चेंडूत 5 धावा केल्या. त्याने रवींद्र जडेजासोबत मिळून २२ षटकांत ३५ धावा जोडून संघाला विजयाच्या जवळ नेले.
खांद्याला किंवा बोटाला इजा करण्याची योजना
कैफ पुढे म्हणाला, “स्टोक्स आणि आर्चर बुमराहविरुद्ध बाऊन्सर टाकण्याची योजना आखत होते. त्यांना बुमराहच्या खांद्याला किंवा बोटाला दुखापत करायची होती. यावेळी आर्चरचा एक चेंडू बुमराहच्या बोटावर लागला, पण ती गंभीर दुखापत नव्हती. मात्र, इंग्लंडचा प्लॅन यशस्वी झाला आणि बुमराह चुकीचा शॉट खेळून स्टोक्सचा बळी ठरला.
बुमराह मँचेस्टरमध्ये खेळणार का?
इंग्लंडविरुद्धकसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच जसप्रीत बुमराह केवळ तीन कसोटी सामने खेळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. अशा तऱ्हेने बुमराह मँचेस्टरमध्ये चौथा कसोटी सामना खेळणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र त्याला चौथ्या सामन्यात खेळण्याचे आवाहन क्रिकेट तज्ज्ञांकडून केले जात आहे.
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी जिओस्टारशी बोलताना सांगितले की, बुमराहच्या अनुपस्थितीमुळे भारताचा पराभव निश्चित होईल आणि आम्ही मालिकाही गमावू. जर मी संघ व्यवस्थापनाचा भाग असतो, तर बुमराहला पुढील सामना खेळण्यास नक्कीच सांगेन कारण ते महत्वाचे आहे. जर तो खेळला नाही आणि मग आपण कसोटी सामना गमावला तर सर्व संपले. बुमराहने शेवटचे दोन कसोटी सामने खेळले पाहिजेत, असे मला वाटते.


