नवी दिल्ली : सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्या कार्यरत आहेत. त्यात भारती एअरटेलच्या नेटवर्कमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याचे समोर आले आहे. एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा ठप्प झाले आहे. यावेळी सर्वात मोठा फटका हा बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये दिसून आला.
दिल्ली-एनसीआरमध्ये एअरटेल आणि जिओचे नेटवर्क डाउन झाले होते. ज्यामुळे कॉल, एसएमएस आणि इंटरनेट सारख्या सेवा विस्कळीत झाल्या होत्या. दुपारी 12.15 च्या सुमारास ही अडचण जाणवू लागली. त्यानंतर ग्राहकांकडून तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत होता. तब्बल 7100 पेक्षा अधिक ग्राहकांनी एअरटेल नेटवर्क डाउन असल्याची समस्या नोंदवली. कंपनीने त्याला तात्पुरती कनेक्टिव्हिटी समस्या असे म्हटले होते.
कंपनीकडून युजर्सना मोबाईल फोन रीस्टार्ट करण्याचा सल्लाही दिला. एअरटेलने ट्विट केले, ‘गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ही समस्या तात्पुरत्या कनेक्टिव्हिटी व्यत्ययामुळे आहे आणि सुमारे एका तासात ती दूर होईल. त्यानंतर कृपया तुमचा मोबाईल रीस्टार्ट करा’.


