पुणे : महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढत असताना बंगालच्या उपसागरात नवे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. यामुळे पुढील २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली असून, मुख्यतः कोरडे हवामान कायम राहील. दुपारी उकाडा आणि रात्री-पहाटे गारठा जाणवत असला तरी उत्तरेकडील जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंशांखाली घसरले आहे. खानदेश भागात थंडीचा कडाका वाढला आहे.
चक्रीवादळाचा थेट प्रभाव महाराष्ट्रावर नसला तरी दक्षिण भारतात धोक्याचे संकेत आहेत. केरळमध्ये १० नव्हेंबरपर्यंत वादळासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडू, कर्नाटक आणि अंदमान-निकोबार बेटांवरही जोरदार पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातही पावसाचे मोठे प्रमाण अपेक्षित आहे.
महाराष्ट्रात मात्र गुलाबी थंडीचा आनंद घेता येईल. शुक्रवारी ब्रह्मपुरी येथे कमाल तापमान ३३.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर धुळे कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. दुपारी पारा ३० अंशांवर राहील, परंतु रात्री थंडी वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशात पर्वतीय वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढेल. शनिवार-रविवारपर्यंत गारठा अधिकच तीव्र होईल. राज्यातील नागरिकांनी हवामान बदलांकडे लक्ष ठेवावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.


