Roof Collapse Tragedy : बिहारच्या पटनामधील दानापूर परिसरात रविवारी (९ नोव्हेंबर) रात्री घडलेल्या भयानक दुर्घटनेने राज्यात शोककळा पसरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असून, एकाच कुटुंबातील पाच जणांचा घराच्या छत कोसळण्यामुळे मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नी आणि तीन अल्पवयीन मुले असून, सर्वजण गाढ झोपेत असतानाच ही दुर्घटना घडली. दानापूरच्या मानस नया पानापूर (४२ पट्टी) गावात घडलेल्या या घटनेने स्थानिक पातळीवर हाहाकार उडाला असून, गावकऱ्यांमध्ये शोकाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं?
स्थानिकांच्या माहितीनुसार, खान कुटुंबातील सर्व सदस्य रविवारी रात्री सुमारे दहा वाजता झोपले होते. अचानक घराचे छत कोसळले, ज्यामुळे जोरदार आवाज झाला. शेजाऱ्यांनी हा आवाज ऐकून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मलबा हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मदतकार्य सुरू होईपर्यंत उशीर झाला होता. मृतदेह अकिलपूर पोलिसांनी बाहेर काढले आणि ते तात्काळ पोस्टमार्टमसाठी पटनाच्या सरकारी रुग्णालयात पाठवले. घटनास्थळी कोणीही जिवंत सापडले नाहीत.
मृतांमध्ये बबलू खान (३२ वर्षे, पती), रौशन खातून (३० वर्षे, पत्नी), त्यांचे मुले मोहम्मद चांद (१० वर्षे), रूकशार (१२ वर्षे) आणि चांदनी (२ वर्षे) यांचा समावेश आहे. ही घटना इतकी भयावह आहे की, एका क्षणात संपूर्ण कुटुंब नष्ट झाले. गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, खान कुटुंब साधे जीवन जगत होते आणि या दुर्घटनेने परिसरात दुखाची लाट पसरली आहे. मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक आणि शेजाऱ्यांना अश्रू अनावर झाले.
अकिलपूर पोलिस स्टेशनचे प्रमुख विनोद कुमार यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात घराचे छत खूप जुने असल्याचे उघड झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि ओलाव्यामुळे छत कमकुवत झाले होते, ज्यामुळे ते अचानक कोसळले. विशेष बाब म्हणजे, हे घर इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधलेले होते, ज्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत आणि इतर सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.


