पुणे: मनसेचे कार्यकर्ते आणि प्रेक्षकांना “पिट्या भाई” म्हणून परिचित असलेले अभिनेता रमेश परदेशी आता राजकीय वर्तुळात चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दीर्घकाळ सक्रिय राहिलेल्या परदेशींनी अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि अखेर त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे.
राज ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर बदलला निर्णय
काही दिवसांपूर्वी झालेल्या मनसेच्या अंतर्गत बैठकीत राज ठाकरे यांनी रमेश परदेशींवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी परदेशींना थेट शब्दात सांगितले, “तुम्ही स्वतःला संघाचा कार्यकर्ता म्हणता, पण मग टाईमपास का करता? एकाच ठिकाणी ठाम राहा.” या वक्तव्याने परदेशी मनोमन धक्का बसल्याचे सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, “संघटना आणि माझ्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीतरी जाणूनबुजून केला आहे.”
20 वर्षांचा विश्वास ढळला
रमेश परदेशींनी सांगितले की, दोन दशकांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत आणि राज ठाकरे हे त्यांचे आदर्श राहिले आहेत. त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी मोठे आहे. पक्षाला जेव्हा गरज भासली, तेव्हा मी सदैव पुढे होतो, असेही ते म्हणाले. मात्र बैठकीतील कठोर शब्द त्यांच्या मनात घर करून बसले आणि त्यामुळे त्यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – “मला शिव्या द्या… पण संघावर आल्यावर…”; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घट्ट नाते
परदेशींनी संघाशी असलेल्या नात्याचा उल्लेख करताना सांगितले, “संघात माझी आजी सेविका होती, वडील प्रथम वर्ष शिक्षक होते. विजयादशमीला मी दरवर्षी सहभागी होतो. संघ हा माझ्या आयुष्याचा भावनिक भाग आहे.” त्यामुळे संघाविषयी झालेली कोणतीही टिप्पणी त्यांना चांगलीच खटकली.
भाजपमध्ये प्रवेश
मनसे सोडताच रमेश परदेशींनी भाजपकडे कूच केली. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी प्रवीण तरडे यांच्या माध्यमातून परदेशींचे भाजपशी संबंध अधिक दृढ झाले. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला. भाजपला वाटते की परदेशींची लोकप्रियता आणि लोकांमध्ये असलेला चेहरा परिचय आगामी निवडणुकांमध्ये फायदेशीर ठरेल.
स्थानिक राजकारणात खळबळ
रमेश परदेशी हे केवळ कार्यकर्ते नसून लोकप्रिय कलाकार असल्याने, त्यांच्या पक्षांतराने पुणे आणि परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये नवे उलथापालथ सुरू झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मनसेला हे नुकसान महत्वाचे ठरू शकते, तर भाजपसाठी हा चेहरा प्रचारक म्हणून ‘अॅसेट’ ठरण्याची शक्यता वर्तवली जाते.


