पालघर: पालघरमधून अत्यंत चीड आणणारी घटना समोर आली आहे. पाणी आणण्यासाठी उशीर झाला म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाणी केली. शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी शाळे ऐवजी जंगलात लपून बसले ही धक्कादायक घटना जव्हारमधून समोर आली आहे. जव्हारच्या जांभूळमाथा येथील शिक्षक लोकनाथ जाधव यांनी शुक्रवारी काही विद्यार्थ्यांना पाणी आणायला पाठवले. तेही थेट दोन किलोमीटर लांब असलेल्या झर्यातून. त्यात त्या विद्यार्थ्यांना पाणी घेऊन शाळेत परतण्यासाठी उशीर झाला. त्यावर शिक्षकाने पाठवलेल्या सर्व चार ते पाच विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. ही मारहाण काही विद्यार्थ्यांनी पाहिली असून या विद्यार्थ्यांनी शाळेत न जाताच दिवस जंगलात लपून काढला. ही घटना कळताच पालकांनी मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात कारवाईची मागणी केली.
मारहाण करणारे शिक्षक लोकनाथ जाधव यांच्या अशा अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. ग्रामस्थांनी यापूर्वी देखील अनेक तक्रारी केल्या असताना गटशिक्षणाधिकारी तसेच वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने पालकांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. पहिली ते आठवीपर्यंत असलेल्या या शाळेत 96 विद्यार्थ्यांची पटसंख्या असून शिक्षक लोकनाथ जाधव हे उशिराने येणे, दिवसभर मोबाईलमध्ये असणे, तसंच विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष असे प्रकार करत असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी पालकांचं ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतकडून करण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय घडलं?
शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी शिक्षक जाधव यांनी विवेक बिपिन भोरे, साईनाथ मोरघा, स्वप्निल मोरघा, चेतन अनेक, प्रमोद जंगली या विद्यार्थ्यांना 1 किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी भरायला पाठवले. दूर अंतर असल्याने या विद्यार्थ्यांना पाणी आणण्यात उशीर झाला, हे निमित्त घेत या शिक्षकाने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. हे चित्र पाहताच उर्वरित विद्यार्थी आपला जीव वाचवत बचाव करण्यासाठी जंगलात लपून बसले. ही बाब पंचायत समितीच्या प्रशासकीय विभागाला कळूनही अद्याप याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. असे भीतीचे सावट कायम ठेवणारा शिक्षक हा अंगणात कांशिलात उभे करणे, अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये रमणे, वारंवार उशिरा शाळेत येणे, शनिवारी सरळ गैरहजेरी…या सर्व प्रकारांनी पालक संतापले आहेत. यामुळे येथील विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ उद्भवली आहे.
शाळेत 1 ली ते 8 वी पर्यंत तुकड्याअसून येथील पट संख्या ही 96 आहे. शाळेची नियमित वेळ ही10.30 आहे. पण शिक्षक 11.15-11.30 वाजता हजेरी लावतात, असा पालकांचा आरोप आहे. शिक्षकांची ही सवयखूप वर्षांपासूनची आहे. अशी परिस्थिती असताना देखील गावकऱ्यांमध्ये एकाच प्रश्नाची चर्चा आहे की, या शिक्षकाच्या पाठीशी कोण? एवढा उर्मटपणा कोणामुळे?” यांना वरदहस्त कुणाचा असे नाना प्रश्न गावकऱ्यांना पडत आहेत. आत्तापर्यंत असंख्य तक्रारी झाल्यातरी यांच्या वागण्यात काही फरक पडत नाही. अखेर या तक्रारींची दखल घेत ढाढरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष भोरे यांनी स्वतः पुढाकार घेतला. ग्रामपंचायत कमिटी, पालक आणि विद्यार्थ्यांची संयुक्त बैठक घेत भोरे यांनी शिक्षण विभागाला थेट सवाल करत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शिक्षकामधला उर्मटपणा
जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जांभूळमाथा येथे शिक्षकाने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याचा सर्वात जास्त वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होत आहे. शाळा म्हणजे मुलांचं भविष्य घडवण्याचं ठिकाण… पण येथे तर शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थी शाळेऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची घटना समोर आल्याने नक्कीच सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.


