फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात राजकीय वातावरण तापले आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक रंगतदार झाली आहे.
शिवसेनेचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत रामराजे यांनी भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली. डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा उल्लेख करत ते म्हणाले, “या घटनेने फलटणचे नाव बदनाम झाले. महिलांना अन्याय झाला तर मी काळा कोट घालून कोर्टात उभा राहीन. घाबरू नका, तुमच्या मागे मी आहे.” याशिवाय, “भाजपच्या बदनामीचे मूळ कारण साताऱ्यात आहे,” असा आरोप करत त्यांनी २०१९ च्या राजकीय चर्चांचा उल्लेख केला.
या वक्तव्याला रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “डोक्यावर परिणाम झाल्यानंतर काही लोक अशी वक्तव्ये करतात. साताऱ्यात भाजपला सर्वाधिक मतदान मिळाले आहे.” महिलांच्या मुद्द्यावर पलटवार करत ते पुढे म्हणाले, “महिलांच्या अन्यायावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. सर्व गुन्हेगार उमेदवार त्यांच्या बाजूने उभे आहेत, हा पाढा वाचायला लावू नये.” महिलांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असून, भाजपला महिलांचा सर्वाधिक पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
१८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये येऊन भाजप उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. “फलटणकर फडणवीसांचे चाहते आहेत, ते दिलेला शब्द पाळतात,” असे रणजीतसिंह म्हणाले. फलटण नगरपालिका निवडणुकीत दोन्ही बाजूंच्या तीव्र वक्तव्यांमुळे राजकीय संघर्ष अधिकच चिघळला असून, पुढील प्रचारात आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.


