Aaditya Thackeray On Ashish Shelar: पुणे दौऱ्यावर आलेले शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर कडाडून टीका केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांच्यापासून ते पुण्याच्या रखडलेल्या विकासापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. आदित्य ठाकरे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर वैयक्तिक प्रहार केला. ‘भाजपमध्ये शेलार यांना मिळणारी वागणूक पाहता, त्यांना आता काउंसलिंगची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, सत्ता असूनही भाजपने काहीच कामे केली नाहीत, म्हणूनच ते आता धर्माचा आणि जातीचा आधार घेऊन राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुण्यातील नागरी समस्यांवरून सरकारला घेरले
पुण्यातील वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि पर्यावरणाच्या ऱ्हासावर आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. जगात नद्यांची पात्रे खोल केली जातात, मात्र पुण्यात ती अरुंद करण्याचे काम सुरू आहे, असे ते म्हणाले. तसेच टेकड्या कापून केल्या जाणाऱ्या बांधकामावर त्यांनी आक्षेप घेतला. पुण्याचे प्रश्न सोडवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
‘बोगस मतदान’ आणि निवडणूक आयोगावर ताशेरे
मुंबईतील मतदार याद्यांच्या घोळावरून त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबईत ३१ टक्के बोगस मतदार सापडणे हे गंभीर असून, निवडणूक आयोग नक्की अस्तित्वात आहे का? असा सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांनी राजकारण पूर्णपणे प्रदूषित केल्याचेही ते म्हणाले.
‘ड्रग्ज’ प्रकरण आणि ‘क्लीन चिट’चा कारभार
सातारा ड्रग्ज प्रकरणात शिंदे यांच्या भावावर झालेल्या आरोपांवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आधी गुन्हे करायचे आणि नंतर स्वतःच स्वतःला ‘क्लीन चिट’ द्यायची, हा या सरकारचा नवा पायंडा आहे. केवळ विरोधकांवर कारवाई करायची आणि सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालायचे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.


