Meenakshi Shinde Resignation : ठाणे महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) आक्रमक नेत्या, माजी महापौर आणि महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका बड्या महिला नेत्याने पद सोडल्याने ठाणे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
राजीनाम्यामागील ‘इनसाईड’ स्टोरी
अधिकृतपणे राजीनामा देताना मीनाक्षी शिंदे यांनी ‘सध्याच्या राजकीय परिस्थितीत काम करण्यास असमर्थ’ असल्याचे कारण दिले असले, तरी यामागे अंतर्गत गटबाजीचे मोठे कारण असल्याची चर्चा आहे. हा संपूर्ण वाद विक्रांत वायचळ यांच्या हकालपट्टीवरून सुरू झाल्याचे समजते.
काय आहे नेमका वाद?
माजी नगरसेवक भूषण भूईरे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, यासाठी काही स्थानिक नेत्यांनी आणि शाखाप्रमुखांनी तीव्र विरोध दर्शवला होता. यामध्ये मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मनोरमा नगरचे शाखाप्रमुख विक्रांत वायचळ आघाडीवर होते. पक्षविरोधी हालचाली केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने वायचळ यांची पक्षातून हकालपट्टी केली. आपल्या खंद्या कार्यकर्त्यावर झालेली ही कारवाई मीनाक्षी शिंदे यांच्या जिव्हारी लागली आणि त्यातूनच त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. महानगरपालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना जोर लावत असतानाच, पक्षातील जुन्या आणि निष्ठावान नेत्यांमध्ये नाराजी पसरणे हा मोठा धक्का मानला जात आहे. महिला आघाडीत मीनाक्षी शिंदे यांचा मोठा प्रभाव असून, त्यांच्या राजीनाम्यामुळे निवडणुकीच्या प्रचारावर आणि महिला कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते मध्यस्थी करणार का, की ठाण्यातील राजकारणात आणखी काही मोठी गळती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐन रणधुमाळीत हे ‘नाराजीनाट्य’ शिवसेनेला किती महागात पडणार, हे येणारा काळच ठरवेल.


