पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने प्रभाग क्रमांक २ (फुलेनगर-नागपूर चाळ) मधून पूजा मोरे-जाधव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग सुरू झाले. पूजा यांच्या जुन्या व्हिडिओ आणि विधानांचा विपर्यास करून ट्रोलिंग करण्यात आले. पक्षांतर्गत कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधानंतर पूजा यांनी १ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत पूजा यांना अश्रू अनावर झाले आणि त्या भावुक होऊन रडल्या.
नेमके प्रकरण काय?
भाजप कार्यकर्ते आणि संघ समर्थकांनी पूजा यांच्या मागील विधानांचे व्हिडिओ व्हायरल केले. यात पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया (‘दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या नाहीत’) आणि मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान फडणवीसांवर टीका असा आरोप आहे. ट्रोलिंग इतकी तीव्र झाली की पक्षाने पूजा यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले. पूजा यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या विधानांचा विपर्यास करण्यात आला आणि ते सोशल मीडियाचे बळी ठरले.
कोण आहेत पूजा मोरे-जाधव?
- पूजा मोरे-जाधव या मूळच्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहेत. गरीब कुटुंबातून येऊन त्यांनी संघर्षमय प्रवास केला आहे.
- २०१७ मध्ये राज्यातील सर्वात तरुण पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या.
- शेतकरी आणि मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय भूमिका; पोलिस लाठ्याकाठ्या, गुन्हे आणि कोर्ट केसेसचा सामना केला.
- २०२४ विधानसभा निवडणुकीत गेवराईतून संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षातून लढल्या.
पती धनंजय जाधव यांच्यासोबत पुण्यात स्थायिक; जुलै २०२५ मध्ये पुण्यात मोफत चिकन वाटप करून चर्चेत आल्या. - शेतकऱ्यांसाठी आणि महिलांच्या मुद्द्यांसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळख.
अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा भावुक
पत्रकार परिषदेत रडत-रडत पूजा म्हणाल्या, “मी सामान्य घरातून आले आहे. धनंजय जाधव यांच्याशी लग्न करून पुण्यात आले. शेतकऱ्यांसाठी लाठ्या खाल्ल्या, गुन्हे अंगावर घेतले. न्यायालयात पैसे नव्हते तरी खटले लढले. पहलगाम हल्ल्यानंतर ८ दिवस तिथे होते, लाल चौकात आंदोलन केले. माझ्या एका छोट्या चुकीचा बाऊ करून षडयंत्र रचले गेले. मी हिंदू मुलगी आहे, हिंदुत्वासाठी काम करणार. भाजपची कार्यकर्ता राहून तळागाळातील लोकांसाठी न्याय मिळवून देणार.”
पती धनंजय जाधव यांनीही सोशल मीडियाचे बळी ठरल्याचे सांगितले. या प्रकरणामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आणि बाहेरील उमेदवारांना तिकीट देण्यावर टीका वाढली आहे. राज्यभर या घटनेची चर्चा सुरू असून, निवडणुकीत भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.


