Raj Thackeray: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मतदानाला अवघे १२ दिवस शिल्लक असतानाच राज्यातील ७० उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या अभूतपूर्व घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
अशी निवडणूक कधीच पाहिली नाही – राज ठाकरे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या बिनविरोध निवडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात मी अशा प्रकारची निवडणूक कधीच पाहिली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मी अनेक निवडणुका जवळून अनुभवल्या, पण इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची परिस्थिती पहिल्यांदाच पाहतोय. ठाण्याचे मनसे नेते अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि राजू पाटील यांनी ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंची भेट घेतली, त्यानंतर हे विधान समोर आले.
बिनविरोध विजयी होण्यामध्ये महायुतीने बाजी मारली आहे:
- भाजप: सर्वाधिक ४४ उमेदवार बिनविरोध.
- शिवसेना (शिंदे गट): २२ नगरसेवक बिनविरोध.
- कल्याण-डोंबिवली पॅटर्न: येथे भाजपचे १५ आणि शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
- इतर: अजित पवारांची राष्ट्रवादी (२), इस्लाम पार्टी (१) आणि अपक्ष (१).
निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राज्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. विरोधी उमेदवारांना धमकावून किंवा प्रलोभन दाखवून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले का, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून या संदर्भात सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित उमेदवारांना विजयी घोषित केले जाणार नाही. या घडामोडींमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


