Savitribai Phule Jayanti: स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक आणि समाजक्रांतीची मशाल पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात सावित्रीबाईंच्या शैक्षणिक आणि सामाजिक संघर्षावर प्रकाश टाकताना प्रा. डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी सांगितले की, ‘स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी सावित्रीबाईंनी केलेला संघर्ष आणि समाजातील अन्यायाविरुद्ध उभारलेला लढा आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.’
तसेच प्रा. मृदुल कांबळे यांनी विद्यार्थिनींना सावित्रीबाईंच्या विचारांचा अंगीकार करून शिक्षणाद्वारे समाजपरिवर्तन घडवण्याचे आवाहन केले. प्रा. विद्या गायकवाड यांनी सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्त्वातील धैर्य आणि दूरदृष्टी यावर भाष्य करत शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे नमूद केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. पायल मगर, कु. आकांक्षा पोळ आणि कु. साक्षी पवार यांनीही आपली मनोगते व्यक्त करत सावित्रीबाईंच्या जीवनकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सर्व विद्यार्थिनींनी यावेळी स्वतःच्या जीवनात शिक्षण, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमासाठी विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. तानाजी कसबे, डॉ. राजाराम गावडे, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास शिंदे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिगंबर बिरादार, कार्यालयीन अधीक्षक अभिमन्यू भंडलकर, प्रा. सिद्धी बोराटे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विद्या गायकवाड यांनी केले, तर आभार प्रा. नीलम माने यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमात सावित्रीबाईंच्या कार्याचा जागर आणि प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.


