Rain Alert : राज्यात गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले असून, पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जोरदार हजेरी लावली असून, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान विभागाने मंगळवारी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, रस्ते वाहतूक आणि लोकल रेल्वे सेवांवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
आज कुठे पडणार जोरदार पाऊस?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.
याशिवाय, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे घाटमाथा परिसर तसेच विदर्भातील अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांमध्येही मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १ जुलैपासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. तसेच २ जुलैपर्यंत संपूर्ण कोकण पट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा भागांवरही होणार असून, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील डोंगराळ परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मान्सूनच्या प्रगतीकडे लक्ष
मान्सूनने २४ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. त्यानंतर त्याने गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडच्या काही भागांत प्रगती केली. मात्र, गेल्या काही दिवसांत मान्सूनचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून आले होते. आता वातावरणातील अनुकूल परिस्थितीमुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


