मुंबई : देशभरात हवामानात सातत्याने बदल होत असून कडाक्याच्या थंडीनंतर वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. वातावरणातील हा झपाट्याने होणारा बदल नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. उत्तरेकडून थंडीची लाट राज्याकडे सरकत असून येत्या दोन ते तीन दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत गारठा वाढला असून काही ठिकाणी अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. जानेवारी महिना सुरू होऊनही पावसाचे सावट कायम असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान, मुंबईत वाढते वायू प्रदूषण गंभीर समस्या बनले आहे. काल रात्री मुंबईच्या अनेक भागांत प्रचंड धूळ आणि धुराचे साम्राज्य होते. आकाश धूसर झाले असून दृश्यता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून थंडी अधिक वाढणार आहे. जळगाव येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून तेथे 9.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. त्यापाठोपाठ धुळे येथे 9.6 अंश, तर जेऊर येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामानातील सततचे बदल आणि वाढते प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि घसा दुखणे अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी मास्कशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राजधानी दिल्ली आणि एनसीआर भागातही तापमानात मोठी घट होण्याची शक्यता असून 5 जानेवारीपर्यंत थंडी अधिक वाढणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. थंडीच्या लाटेचा इशारा एकूण पाच राज्यांना देण्यात आला असून केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याचीही शक्यता आहे.


