नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. १०) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा घेत महायुतीसाठी प्रचाराचा बिगुल फुंकला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या या सभेत शिंदे यांनी नाशिककरांना विकासाची हमी देत अनेक मोठ्या घोषणा केल्या.
महायुतीची सत्ता महापालिकेत आल्यास ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना घरपट्टी माफी, सिडकोतील २५ हजार घरे फ्री होल्ड करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच तपोवन परिसरातील झाडे वाचवण्याची ग्वाही देत भाजपवर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ‘दत्तक नाशिक’ या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही थेट निशाणा साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले, “मागील काही वर्षांत नाशिकमध्ये सत्ता असूनही अपेक्षित विकास झाला नाही. काहींनी नाशिक दत्तक घेतलं, पण शहरासाठी काहीच केलं नाही. मी नाशिककरांना शब्द देतो, महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्या. आम्ही नाशिकची आईसारखी सेवा करू. आमचा अजेंडा विकासाचा आहे. आम्ही काम करणारे आहोत, स्थगिती देणारे नाही.”
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हजारो कोटींची विकासकामे होणार असल्याचे सांगत शिंदे यांनी शहरासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. “सर्वसामान्यांचे सोन्याचे दिवस आणायचे आहेत. युतीचे सर्व उमेदवार तगडे असून आमची युती विकासासाठी आहे. नाशिकचा चेहरा-मोहरा बदलायचा आहे. प्रत्येक विभागात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येतील,” असे आश्वासन त्यांनी दिले. विरोधकांवर टीका करत “या निवडणुकीतून विरोधकांचा टांगा पलटी करायचा आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचा पुनरुच्चार करत शिंदे म्हणाले, “ही योजना बंद करण्यासाठी काही जणांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, अगदी न्यायालयातही गेले. मात्र लाडक्या बहिणींनीच त्यांना आडवं केलं. ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही.”
यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवरही जोरदार टीका केली. “सिंहस्थापूर्वी नाशिकमध्ये ठाकरे बंधूंचा ‘सुंभमेळा’ भरला होता. वीस वर्षांनी एकत्र आले, कारण तीस वर्षांनंतर काय होणार याची चिंता त्यांना सतावत आहे,” असा टोला शिंदे यांनी लगावला. राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत काही लोक निवडणुकीत पावसाळ्यातील छत्रीसारखे उगवतात, जनतेच्या प्रश्नांशी त्यांना देणंघेणं नसल्याचे ते म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांच्यावर विकासापेक्षा तिजोरीतच अधिक रस असल्याची टीका त्यांनी केली.


