BMC Election 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार बिनविरोध निवडून येत असताना, या प्रक्रियेला आव्हान देणारे मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. बिनविरोध निवड झालेल्या वॉर्डांमध्येही मतदारांना ‘नोटा’ (NOTA) चा अधिकार असावा, या मागणीसाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. इतकेच नव्हे तर, न्यायालयाची दिशाभूल केल्याबद्दल खंडपीठाने याचिकाकर्त्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा – BMC Election 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचा निकाल लांबणीवर! काय आहे यामागचं नेमकं कारण ?
न्यायालयात काय घडले ?
न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांनी ही याचिका आधीच्या प्रलंबित याचिकांसारखीच असल्याचे सुरुवातीला सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे साम्य नसल्याचे समोर आल्यावर न्यायालयाने ‘तुम्ही न्यायालयात चुकीचे विधान का केले?’ असा सवाल विचारला. माहिती देताना केलेली घाई आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याबद्दल खंडपीठाने सुरुवातीला याचिकाकर्त्यांना दंड ठोठावण्याचे संकेत दिले होते.
हेही वाचा –मोठी बातमी…! मुंबईत ठाकरे बंधूंची ताकद वाढली; मराठा मोर्चा संघटनेचा जाहीर पाठिंबा
न्यायालयाचे निरीक्षण
एखाद्या पक्षकारासाठी चुकीची माहिती देताना तुमची नेमकी भीती काय होती? अशा शब्दांत न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना खडे बोल सुनावले. अखेर दंड न आकारता ही याचिका निकाली काढण्यात आली. याचिकेवर हा निकाल येत असतानाच, राज्यातील २९ महापालिकांमध्ये मतदानापूर्वीच सत्तेचे गणीत स्पष्ट होताना दिसत आहे. आतापर्यंत ६६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. अविनाश जाधव यांची ही याचिका फेटाळली गेल्याने आता बिनविरोध झालेल्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, लोकशाहीत मतदारांना नाकारण्याचा अधिकार (नोटा) हिरावला जात असल्याचा मुद्दा मनसेने या याचिकेच्या माध्यमातून लावून धरला होता.


