मुंबई : महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेनंतर समीकरणांना वेगळीच कलाटणी मिळाल्याचं चित्र आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेनंतर मुंबईत जबरदस्त वातावरणनिर्मिती झाली आहे. या सभेनंतर भाजपकडून ठाकरे बंधूंवर जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली असतानाच, आता मराठा मोर्चाने थेट ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर केल्यामुळे राजकीय चर्चांना नवा आयाम मिळाला आहे.
मराठा मोर्चाचा ठाकरे बंधूंना जाहीर पाठिंबा
महापालिका निवडणुकीसाठी मुंबईतील मराठा बांधव ठाकरे बंधूंना मतदान करण्याचं आवाहन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पोस्टरद्वारे हे आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पोस्टरमधून स्पष्ट संदेश
मराठा मोर्चाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये, “मुंबई ही ठाकरे यांच्याच हातात शोभून दिसणार” असा ठळक संदेश देण्यात आला आहे. या पोस्टरद्वारे मराठा समाजाचा ठाकरे बंधूंना उघड पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट
मनोज जरांगे यांच्या या आवाहनानंतर मराठा मोर्चाने मुंबईत ठाकरे बंधूंना पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका निर्णायक ठरणार का, याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे बंधूंच्या सभेनंतर आधीच तापलेल्या वातावरणात, मराठा मोर्चाच्या या भूमिकेमुळे मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून, याचा थेट परिणाम मतदानावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


