Chandrapur Accident: गडचिरोली जिल्ह्यातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कोलपाकवार कुटुंबावर काळाने पुन्हा एकदा झडप घातली आहे. जावयाचा अंत्यसंस्कार आटोपून परतत असताना, आलापल्ली-आष्टी महामार्गावरील दिना नदीच्या पुलावरून कार थेट पात्रात कोसळली. या भीषण अपघातात कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
एका दुःखातून सावरण्यापूर्वीच दुसरी दुर्घटना
नागेपली येथील व्यापारी सतीश कोलपाकवार हे आपल्या नातेवाईकांसह जावयाचा अंत्यविधी आटोपून आष्टीकडे परतत होते. आलापल्लीहून निघालेली त्यांची ‘हुंडई व्हेन्यू’ कार दिना नदीच्या पुलावर आली असता, अरुंद रस्ता आणि पुलाच्या रचनेचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. गाडी पुलाचे कठडे तोडून थेट नदीच्या पात्रात कोसळली. अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
हेही वाचा – Pune Cycling Tour Accident: पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये अपघात, 70 हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळून जखमी
दोघांचा करुण अंत, तिघे मृत्यूशी झुंज देतायत
या अपघातात यादव कोलपाकवार (रा. आष्टी) यांचा जागीच मृत्यू झाला. सुनील कोलपाकवार (रा. आष्टी) यांना गंभीर अवस्थेत अहेरी येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कारमधील इतर तिन जण गंभीर जखमी असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अरुंद पूल ठरतोय ‘डेथ ट्रॅप’
या अपघातानंतर दिना नदीवरील पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुलाची अरुंद रचना आणि कमकुवत संरक्षक कठड्यांमुळे वाहनचालकांना अनेकदा अंदाज येत नाही. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत केली. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून कोलपाकवार कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे.


