Jaykumar Gore on Devendra Fadnavis : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुराळा अद्याप खाली बसलेला नसतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूरसह विविध ठिकाणी अशी राजकीय समीकरणे जुळवण्याची चाचपणी सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात विरोधकांना थेट आणि कडक शब्दांत इशारा दिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समाधान काळे आणि गणेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांच्यावर निशाणा साधत जयकुमार गोरे म्हणाले, “नाद कुणाचाही करा, पण देवाभाऊंच्या नादी लागू नका,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
गोरे पुढे म्हणाले की, काही लोक भाजपला संपवण्याची भाषा करत आहेत. मात्र, “भाजप संपवणारा अजून जन्मालाच यायचा आहे. आपल्या कुवतीप्रमाणे बोलावं. भाजपने हात वर केले, तर तुमच्या डोक्यावरचं छत काढायला वेळ लागणार नाही,” असे सूचक आणि आक्रमक वक्तव्यही त्यांनी केले. हा इशारा आमदार अभिजीत पाटील यांच्यासाठी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पंचायत समिती गणात भाजपकडून दोन इच्छुक उमेदवारांना चुकून AB फॉर्म दिल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मळसिद्ध मुगळे आणि रेवणसिद्ध मेंडगुदले या दोघांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
मात्र, सुनावणीनंतर मळसिद्ध मुगळे यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला, तर रेवणसिद्ध मेंडगुदले यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. या घडामोडींमुळे येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


