VIP Flight Security : बारामतीमधील भीषण विमान अपघाताने केवळ पवार कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्य सरकारने ‘व्हीआयपी’ प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या तांत्रिक सुरक्षेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे. सरकारी हवाई ताफ्याची डागडुजी आणि आधुनिकीकरण करण्यासाठी महायुती सरकारने तब्बल ६ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला असून, त्याबाबतचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.
सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारची तातडीची कृती
अजित पवारांच्या विमानाला झालेल्या अपघाताने सरकारी ताफ्यातील यंत्रसामग्रीच्या दर्जावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर, प्रलंबित असलेले सुरक्षेचे प्रस्ताव मार्गी लावण्यात आले आहेत. अर्थ विभागाने प्रत्येकी ३ कोटी रुपयांच्या दोन वेगवेगळ्या पुरवणी मागण्यांना हिरवा कंदील दिला आहे. या माध्यमातून विमानांची तांत्रिक दुरुस्ती आणि सुटे भाग खरेदी करण्यातील आर्थिक अडथळे दूर झाले आहेत.
डिसेंबरमधील प्रस्तावाला आता ‘अनिवार्य’ गती
विशेष म्हणजे, या निधीची मागणी डिसेंबर २०२५ च्या हिवाळी अधिवेशनातच करण्यात आली होती. मात्र, अजित पवारांच्या दुर्दैवी अपघातानंतर वित्त विभागाच्या ‘व्यय अग्रक्रम समिती’ने या फाईलवर तातडीने शिक्कामोर्तब केले. हा संपूर्ण खर्च ‘अनिवार्य’ गटात टाकण्यात आला असून, चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) ही कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
युद्धपातळीवर देखभाल-दुरुस्ती
भविष्यात तांत्रिक दोषांमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि प्रवाशांची सुरक्षा अबाधित राहावी, हा या निर्णयाचा मुख्य गाभा आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सरकारी हवाई ताफ्याच्या देखभालीकडे आता प्रशासन ‘मिशन मोड’वर लक्ष देणार असून, तांत्रिक त्रुटी दूर करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.


