Ajit Pawar Plane Crash : ‘विमान लँड झालं की थेट काटेवाडी गाठायचीय, आईला भेटून मगच सभेला निघायचंय…’ हे अजित पवारांचे शेवटचे शब्द एखाद्या काळजाला चटका लावणाऱ्या स्वप्नासारखे ठरले. २८ जानेवारीच्या त्या दुर्दैवी दिवशी नियतीने बारामतीच्या भूमीवर असा काही घाला घातला की, धडाडीच्या नेतृत्वाचा हा प्रवास मातोश्रींच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कायमचा थांबला.
त्या सकाळी नेमकं काय घडलं?
अजित पवारांचे विश्वासू सहकारी किरण गुजर यांनी त्या काळरात्रीपूर्वीच्या काही तासांचा थरार उलगडला आहे. त्यांच्या मते, सकाळी ७ वाजताच दादांनी फोन करून ८:४५ ला विमानतळावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्याकडे निवडणुकीची महत्त्वाची कागदपत्रे द्यायची होती. दिवसभरात चार तोफखाना सभा गाजवण्याचा त्यांचा निर्धार होता, पण त्याआधी त्यांना ओढ लागली होती ती म्हणजे आपल्या आई आशाताईंची भेट घेण्याची. अजित पवार बारामतीत पाऊल ठेवताच सर्वात आधी आईकडे धाव घेत. कामाचा कितीही डोंगर असला तरी काटेवाडीच्या घरी आईसोबत घालवलेला तो अर्धा तास त्यांच्यासाठी ऊर्जेचा स्रोत असायचा. त्या दिवशीही आईचे आशीर्वाद घेऊनच ते प्रचाराच्या मैदानात उतरणार होते, परंतु नशिबाचा कौल काही वेगळाच होता.
विमानतळावरील तो भीषण तांडव
धावपट्टीवर दादांच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या किरण गुजर यांनी आपल्या डोळ्यांनी मृत्यूचे तांडव पाहिले. त्यांनी सांगितलेला प्रसंग सुन्न करणारा आहे. ‘आकाशात विमान दिसलं खरं, पण त्याचा वेग खूपच विसंगत होता. लँडिंगच्या प्रयत्नात असतानाच विमानाने हवेत दोन भयानक गिरक्या घेतल्या आणि ते थेट जमिनीवर आदळलं. पाहता पाहता विमानाचा आगीचा गोळा झालं,’ असं गुजर यांनी सांगितलं.
कर्तव्याची कागदपत्रे आणि अखेरचा श्वास
स्फोट इतका भीषण होता की एक मृतदेह विमानाबाहेर फेकला गेला. गुजर जेव्हा घटनास्थळी धावले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. देह ओळखण्यापलीकडे गेला होता, तरीही चाळीस वर्षांच्या ऋणानुबंधातून त्यांनी आपल्या नेत्याला ओळखले. विशेष म्हणजे, ज्या फाईल्स आणि कागदपत्रांसाठी दादांनी सकाळी फोन केला होता, ती सर्व कागदपत्रे त्यांच्या मृतदेहाभोवती विखुरलेली होती. शेवटच्या श्वासापर्यंत हा लोकनेता जनतेच्या कामातच गुंतलेला होता, याची साक्ष ती विखुरलेली पाने देत होती.


