IND vs PAK : 2026 च्या T20 विश्वचषकात 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. या महामुकाबल्यापूर्वी दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असतानाच, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. “आम्ही भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास तयार आहोत,” असे सांगत त्याने खेळाच्या भावनेला सर्वोच्च स्थान देण्याचे आवाहन केले आहे.
‘नो-हँडशेक’ धोरण आणि क्रीडा भावनेचे महत्त्व
गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुरक्षेच्या आणि धोरणात्मक कारणास्तव पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले होते. आता विश्वचषकासारख्या मोठ्या मंचावर भारतीय संघ आपले ‘नो-हँडशेक’ धोरण कायम ठेवणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान आघा म्हणाला, “क्रिकेट हा खेळाच्या भावनेनेच खेळला पाहिजे. माझे वैयक्तिक मत कदाचित महत्त्वाचे नसेल, पण क्रिकेट नेहमीप्रमाणेच खेळले गेले पाहिजे. आता पुढे काय करायचे, हे भारतीय संघाने ठरवायचे आहे.”
अभिषेक शर्माच्या फिटनेसबद्दल उत्सुकता
या पत्रकार परिषदेत सलमान आघाने भारतीय अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माबद्दलही विशेष मत व्यक्त केले. संसर्गामुळे अभिषेक नामिबियाविरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता. “मला आशा आहे की अभिषेक शर्मा उद्याच्या सामन्यात खेळेल. मला सर्वोत्तम आणि मजबूत संघाविरुद्ध खेळायला आवडते आणि अभिषेक तंदुरुस्त होऊन मैदानात परतेल, अशी मला खात्री आहे,” असे आघाने नमूद केले. अभिषेक शर्माची उपस्थिती भारतीय संघाची ताकद वाढवणारी ठरणार आहे.
भारताविरुद्धचा खराब रेकॉर्ड आणि इतिहासाचे आव्हान
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचे वर्चस्व मान्य करताना सलमान आघाने कबुली दिली की, या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा रेकॉर्ड खराब आहे. भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत विश्वचषकात 8 वेळा आमनेसामने आले असून, भारताने 7 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला केवळ 1 विजय मिळवता आला आहे. “आम्ही इतिहास बदलू शकत नाही, पण प्रत्येक दिवस हा एक नवीन दिवस असतो. आम्ही या खराब रेकॉर्डचा विचार न करता नव्या दमाने मैदानात उतरू,” असा विश्वासही त्याने व्यक्त केला.


