Supriya Sule: साताऱ्यात राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई यांना सत्ताधारी भाजपच्याच नेत्यांकडून झालेल्या कथित मारहाण आणि धक्काबुक्कीच्या प्रकाराचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली असून, ‘पांडुरंगा, काय दिवस बघायला मिळत आहेत महाराष्ट्रात,’ असे म्हणत त्यांनी थेट हात जोडले आहेत.
लोकशाही की गुंडागर्दी? सुप्रिया सुळेंचा सवाल
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेना (शिंदे गट) आमदारांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, ‘एका कॅबिनेट मंत्र्याला अशा प्रकारे रस्त्यावर मारहाण होणे ही लोकशाहीची हत्या आहे. हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही, तर तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालेल. अशा प्रकारची गुंडागर्दी जर आज सहन केली, तर उद्या ही प्रवृत्ती अधिक बळावेल.’
‘त्या’ कृत्यामागे पोलिसांचा हात नाही, तर ‘अदृश्य शक्ती’!
या घटनेवेळी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या भूमिकेवर बोलताना सुळे यांनी पोलिसांची पाठराखण करत सत्तेतील वरिष्ठ यंत्रणेवर निशाणा साधला. ‘महाराष्ट्राचे पोलीस स्वतःहून असे कधीच करणार नाहीत. त्यांच्या पाठीशी जी कोणती ‘अदृश्य शक्ती’ उभी होती, तिनेच हे सर्व करायला लावले आहे,’ असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांना पत्र आणि दिल्लीत चर्चा
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुप्रिया सुळे यांनी पुढील पावले उचलली आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार आहेत. दिल्लीतील वृत्तपत्रांमध्येही या घटनेच्या बातम्या आल्याने सुळे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सुळे यांनी आमदार मकरंद पाटील यांच्याशी फोनवर चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली असून, त्या लवकरच शंभुराज देसाई यांच्याशीही बोलणार आहेत.
‘मित्रपक्षातच जुंपली?’ सत्तेतील वादावर टोला
ज्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात, त्याच सरकारमधील लोक तुम्हाला धक्काबुक्की करत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशा शब्दांत त्यांनी महायुतीमधील अंतर्गत वादावर मिश्किल टोला लगावला. साताऱ्यातील हा प्रकार म्हणजे सत्तेचा माज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


