Electricity Bill : राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत वीजदरात 10 ते 14 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होणार असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या वीजबिलात लक्षणीय घट होणार आहे.
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच हा निर्णय घेतल्याने महागाईने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वीज वापराच्या सर्व टप्प्यांमध्ये दरकपात करण्यात आली असून महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या सर्व कंपन्यांनी घरगुती वीजदर कमी केले आहेत.
प्रति युनिट नवीन दर (घरगुती वापरासाठी):
0 ते 100 युनिट्स: 4.76 रुपयांवरून 4.30 रुपये (सुमारे 9.7 टक्के कपात)
101 ते 300 युनिट्स: 7.96 रुपयांवरून 7.10 रुपये (सुमारे 10.8 टक्के कपात)
301 ते 500 युनिट्स: 13.55 रुपयांवरून 11.64 रुपये (सुमारे 14 टक्के कपात)
500 पेक्षा जास्त युनिट्स: 14.55 रुपयांवरून 12.64 रुपये (सुमारे 13.1 टक्के कपात)
विशेष म्हणजे, कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी बेस्टकडून आणखी स्वस्त दर लागू करण्यात आले आहेत.
दरम्यान, महावितरण, अदानी, बेस्ट आणि टाटा पॉवर या वीज वितरण कंपन्यांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे दरकपातीचा प्रस्ताव सादर केला होता. आयोगाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर ही दरकपात लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ग्राहकांच्या खिशावरचा ताण कमी होणार असून, एप्रिलपासून येणारे वीजबिल हलके होणार आहे.


