Eknath Khadse: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्याविरोधात जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनी हडपल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
हे प्रकरण 2002 सालातील आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक 122 ही महार वतनाची जमीन चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. फिर्यादीनुसार, एकनाथ खडसे यांनी या परिसरात ‘तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना’ सुरू करण्याचे आमिष दाखवून ही जमीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. जमिनीचा चांगला मोबदला आणि कुटुंबातील सदस्यांना कारखान्यात रोजगार देण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते.
अशिक्षितपणाचा फायदा आणि कागदपत्रांत खाडाखोड
तक्रारदार चमेलाबाई तायडे यांच्या म्हणण्यानुसार, खडसे यांनी त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत 51 हजार रुपये आगाऊ दिले आणि सर्वांचे अंगठे घेऊन बोदवड दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी केली. मात्र, अनेक वर्षे उलटूनही तिथे कारखाना उभारला गेला नाही. 2025 मध्ये कुटुंबाने या जमिनीची माहिती काढली असता, ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून शारदा एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे समोर आले.
खरेदीखतात फेरफार केल्याचा आरोप
11 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा मूळ खरेदीखताची प्रत तपासण्यात आली, तेव्हा त्यात धक्कादायक फेरफार दिसून आले. खरेदीखतामध्ये जिथे ‘तापी-पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ असे नाव होते, तिथे खाडाखोड करून ‘शारदा एकनाथ खडसे’ असे नाव लिहिल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तायडे कुटुंबाने रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीअंती चमेलाबाई तायडे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात एकनाथ गणपत खडसे, शारदा एकनाथ खडसे, मध्यस्थ सुधाकर पाटील आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी-कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, अनेक वर्षांनंतर उघडकीस आलेल्या या जमिनीच्या व्यवहारामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.


