Toll Hike: नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात पुणेकर वाहनचालकांसाठी महागाईचा धक्का घेऊन आली आहे. १ एप्रिलपासून पुण्याला जोडणाऱ्या तीन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांवर टोलच्या दरात सरासरी 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या दरवाढीवर अधिकृत शिक्कामोर्तब केल्यामुळे आजपासून प्रवासाचा खर्च वाढणार आहे. पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर आणि पुणे-नाशिक या मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांना आता सुधारित दरपत्रकानुसार पैसे मोजावे लागणार आहेत.
प्रवासासाठी आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
सुधारित दरपत्रकानुसार, कार, जीप आणि हलक्या वाहनांसाठी एकेरी प्रवासाला 95 रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी 130 रुपये मोजावे लागतील. हलकी व्यावसायिक वाहने चालवणाऱ्यांना एकेरी प्रवासासाठी 150 रुपये तर परतीच्या प्रवासासाठी 210 रुपये खर्च येईल. बस आणि ट्रकसारख्या मोठ्या वाहनांसाठी हा दर 315 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, मोठी अवजड वाहने चालवणाऱ्या प्रवाशांना आता 545 रुपयांपासून ते 815 रुपयांपर्यंतचा मोठा टोल भरावा लागणार आहे. या दरवाढीमुळे मालवाहतूक आणि खाजगी प्रवासावर थेट परिणाम होणार आहे.
कॅशलेस व्यवहारांवर ‘वॉच’ आणि कडक नियमावली
NHAI ने केवळ टोलचे दरच वाढवले नाहीत, तर वसुलीची प्रक्रिया देखील अधिक कडक केली आहे. टोलनाक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी ‘कॅशलेस’ प्रवासावर विशेष भर देण्यात येत आहे. प्रत्येक गाडीला वैध फास्टॅग (FASTag) असणे आता अनिवार्य आहे. जर गाडीला फास्टॅग नसेल किंवा तो अवैध असेल, तर वाहनचालकाला थेट दुप्पट टोल भरून दंड सोसावा लागेल. फास्टॅगशिवाय प्रवासाची ही चूक वाहनचालकांसाठी मोठी महागात पडू शकते.
UPI पेमेंटला दंडाचा फटका; प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जात असले तरी, टोलनाक्यावर फास्टॅगऐवजी यूपीआय (UPI) द्वारे पेमेंट करण्याचा प्रयत्न केल्यास अतिरिक्त भुर्दंड भरावा लागणार आहे. अशा परिस्थितीत एकूण टोलच्या 1.25 पट (सव्वापट) रक्कम दंड म्हणून आकारली जाईल. त्यामुळे प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या फास्टॅग खात्यात पुरेसा बॅलन्स असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामुळे प्रवासात होणारा दंडाचा मनस्ताप आणि वेळ वाचवणे शक्य होईल.


