Solapur accident : सोलापूर जिल्ह्यातील नातेपुतेजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. मुंबईहून फोंडशिरसकडे निघालेल्या कुटुंबाची कार निरा उजवा कालव्याच्या पुलावरून थेट पाण्यात कोसळली. या दुर्दैवी घटनेत चालकाची पत्नी आणि सासू-सासरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक थोडक्यात बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा मुंबईहून निघालेलं हे कुटुंब पहाटे सुमारे पाचच्या सुमारास नातेपुते परिसरात पोहोचले. याच वेळी कारचा ताबा सुटून ती कालव्यात पडली. गाडीत अडकलेल्या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो निष्फळ ठरला.
या अपघातात मृत झालेले सर्वजण सातारा जिल्ह्यातील दुधबावी येथील असून मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्यास होते. चालक सुनील टिळेकर हा या अपघातातून बचावला, मात्र त्याच्या डोळ्यासमोरच कुटुंबीयांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.


