Asha Bhosle: प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी आशा भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सोमवारी 14 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. संगीत,क्रीडा, राजकीय वर्तुळातील मंडळी आशा भोसले यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट कर त्यांना आदरांजली दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
‘तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली’, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या दुःखद निधनाबाबत शोक व्यक्त केला.
आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह २० भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये १२,००० वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर…’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या दुःखद निधनाने गेल्या चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा, आणि मनामनांना एका चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला आहे. आशाताईंचा स्वर कानावर पडला नाही, असा दिवस गेल्या अनेक दशकांत उजाडला नाही, आणि मावळलाही नाही. या स्वराने असंख्य क्षण फुलविले, आणि फुलवत शकुनाच्या मेंदीने रंगलेले जगण्याचे असंख्य क्षण हसविलेदेखील. आशाताई ऐहिकदृष्ट्या आपल्यात नाहीत ही जाणीव पचविणे अवघड आहे, पण त्या स्वरांची सोबत मात्र कायम राहणार आहे. कारण या स्वरांचा साज कालातीत आहे. अनेक वेळा आशाताईंनी भेटण्याचे भाग्य मला लाभले, ते अविस्मरणीय क्षण कायमस्वरूपी माझ्या मनात अजरामर राहतील. आशाताईंच्या आत्म्यास सद्गती लाभावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही संपूर्ण शिवसेना परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून शोक व्यक्त…
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आशा भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो.
आशा भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतिक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आपल्या कर्तृत्वाने संगीत क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरही विशेष ओळख मिळाली होती असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले आहे.
आशा भोसले यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


