मुंबई : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी (दि. ११) आशा भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर रविवारी (दि. १२) वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सोमवारी १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे झाला. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या संस्कारातून त्यांनी संगीताचे धडे घेतले. सुरुवातीच्या संघर्षानंतर त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा २० पेक्षा अधिक भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड करून विक्रम प्रस्थापित केला. “पिया तू अब तो आजा”, “दम मारो दम”, “चुरा लिया है तुमने”, “ये मेरा दिल” यांसारखी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. विशेषतः आर.डी बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी भारतीय चित्रपटसंगीताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक ठरली.


