Anjali Damania: नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या राजकीय आणि प्रशासकीय लागेबांध्यांचा कच्चाचिठ्ठा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यासह उघड केला आहे. एका विशेष पत्रकार परिषदेत दमानिया यांनी खरातच्या मोबाईल संभाषणाची संपूर्ण यादी सादर केली. यामध्ये राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते आणि उच्चपदस्त अधिकाऱ्यांची नावे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चाकणकरांच्या १७७ कॉल्सवर दमानियांचे बोट
अंजली दमानिया यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात वारंवार संवाद होत होता. चाकणकर यांनी खरातला तब्बल १७७ वेळा फोन केल्याचे समोर आले असून, त्यातील एक कॉल २२ मिनिटांचा होता. “एवढे पुरावे असतानाही महिनाभर चाकणकरांची साधी चौकशी का झाली नाही?” असा सवाल करत दमानिया यांनी आता थेट एसआयटी (SIT) कडे त्यांच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे.
सत्ताधारी आणि विरोधक एकाच रांगेत?
अशोक खरातच्या संपर्कात केवळ सामान्य भक्त नसून महाराष्ट्राचे ‘पॉवर सेंटर’ असलेले नेते होते, असा दावा दमानिया यांनी केला आहे. त्यांनी जाहीर केलेल्या नावांमध्ये एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भुसे आणि विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक (PA) यांचा समावेश आहे. दरम्यान, जयंत पाटील यांचे नाव या यादीत पाहून आपल्याला विशेष दुःख झाल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या सर्व नेत्यांचे खरातशी असलेले संबंध नेमके कशासाठी होते, याचे स्पष्टीकरण आता दमानिया यांनी मागितले आहे.
महसूल आणि पोलीस यंत्रणेवरही गंभीर आरोप
भोंदूबाबाच्या जाळ्यात केवळ राजकारणीच अडकले नव्हते, तर प्रशासकीय यंत्रणाही त्याच्या ‘दरबारी’ हजेरी लावत होती. तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि अभिजित भांडे पाटील यांसारख्या अधिकाऱ्यांवर दमानिया यांनी निशाणा साधला आहे. “खरातला मोठे करण्यात राजकारणी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचाच हात आहे. काही जण भविष्य जाणून घेण्यासाठी गेले असतील, पण अनेकांचे त्यामागे विशिष्ट हेतू होते,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. अंजली दमानिया यांनी गोळा केलेला हा सर्व तांत्रिक पुरावा आता तपास यंत्रणांकडे सोपवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आगामी काळात अनेक बड्या नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


