Vikas Lawande Attack: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपी संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह १० ते १२ अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केवळ शाईफेकच नाही, तर बंदुकीचा धाक दाखवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांच्यावर शस्त्र कायद्यांतर्गत (Arms Act) कारवाई केली आहे.
नेमकी तक्रार काय?
विकास लवांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला पूर्वनियोजित होता. लोणी काळभोर जवळील एका गावात प्रवचन सेवा संपवून पुण्याकडे परतत असताना, ३-४ गाड्यांनी लवांडे यांचे वाहन निर्जन स्थळी अडवले. हल्लेखोरांनी त्यांना बळजबरीने गाडीतून उतरवून स्मशानभूमीजवळ नेले. लवांडे यांचा आरोप आहे की, आरोपींनी त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवून “तुझा खात्मा करू” अशी धमकी दिली. “आमच्या गुरूबद्दल का बोलतोस?” असे म्हणत संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्या साथीदारांनी लवांडे यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या ओतल्या.
पोलिसांची भूमिका आणि कारवाई
पोलीस उपायुक्त सागर कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आणि लवांडे यांची फिर्याद यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेसह १९५९ च्या शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या चेहऱ्यांची ओळख पटवून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. संरक्षणाची मागणी केली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आळंदीत संतापाची लाट; राजकीय निषेध
या घटनेचे पडसाद तीर्थक्षेत्र आळंदीतही उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विलास कुराडे, काँग्रेसचे संदीप नाईकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी आळंदीत एकत्र येऊन या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. वारकरी संप्रदायातूनही अशा हिंसक प्रवृत्तींविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.


