Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात शनिवारी रात्री अत्यंत दुर्दैवी घटना घडली. शेतातील विहिरीत मोटार पंप बसवण्याचे काम सुरू असताना अचानक विहीर खचल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या दुर्घटनेत बाजीराव सर्जेराव काकडे आणि त्यांचे दोन मुलगे आजिनाथ व शाम काकडे यांचा जागीच मृत्यू झाला.
शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. बाजीराव काकडे आपल्या दोन मुलांसह विहिरीत उतरून काम करत असताना अचानक मातीचा मोठा भाग कोसळला. क्षणार्धात तिघेही ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
या हृदयद्रावक घटनेने धानोरा गावावर शोककळा पसरली आहे. मेहनती आणि मनमिळावू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काकडे कुटुंबावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.
आज सकाळी ११ वाजता धानोरा येथील स्मशानभूमीत तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून गावात शोकमय वातावरण आहे.


