Pune IT Jobs : पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयटी क्षेत्रात करिअरची स्वप्ने घेऊन आलेल्या 700 हून अधिक तरुण-तरुणींच्या आयुष्याला मोठा धक्का बसला आहे. हिंजवडी फेज-2 मधील ‘थिंक टेक्नॉलॉजी इंडिया’ या कंपनीने अचानक कार्यालय बंद केल्याने शेकडो सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, फ्रेशर्स आणि इंटर्न्स बेरोजगार झाले आहेत.
माहितीनुसार, कंपनीने अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकवले होते. फेब्रुवारीपासून वेतन रखडू लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता, “आंतरर्गत ऑडिट सुरू आहे” असे कारण देत वेळकाढूपणा करण्यात आला. मात्र, अचानक कंपनीला टाळे लागल्याने कर्मचाऱ्यांवर संकट कोसळले.
एका पीडित कर्मचाऱ्याने सांगितले की, पगारासाठी देण्यात आलेला 15 हजार रुपयांचा धनादेश बाऊन्स झाला. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हर्षल ठाकरे मोठी रक्कम घेऊन फरार झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच, अनेकांनी पोलिसांकडे तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
या प्रकरणात फ्रेशर्सचीही मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप आहे. नोकरी आणि लॅपटॉप देण्याच्या नावाखाली सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून लाखो रुपये घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ना पगार मिळाला ना जमा केलेली रक्कम परत मिळाली, असा आरोप कर्मचारी करत आहेत.
अचानक झालेल्या टाळेबंदीमुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. घरभाडे, कर्जाचे हप्ते, दैनंदिन खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलणे कठीण झाले असून अनेक कुटुंबे चिंतेत आहेत.
दरम्यान, संतप्त कर्मचाऱ्यांनी हिंजवडी पोलीस ठाणे आणि कामगार विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. कामगार विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कंपनीच्या व्यवहारांची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.


