Raigad Crime: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि वेदनादायी घटना उघडकीस आली आहे. एका २९ वर्षीय मातेने आपल्या चार निष्पाप मुलांना कोल्ड्रिंकमधून विषारी औषध पाजले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकारात आईसह तिच्या दोन चिमुरड्या मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन बालके मृत्यूशी झुंज देत आहेत. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र हळहळ आणि खळबळ व्यक्त होत आहे.
आईसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू; मृतांची नावे समोर
घटनेतील मृतांची माहिती: ही दुर्दैवी घटना माणगावमधील खरवली आदिवासी वाडीवर घडली आहे. आशा जाधव (वय २९) असे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या महिलेचे नाव आहे. या घटनेत आशा यांच्यासह त्यांची ७ वर्षांची मुलगी नंदिनी जाधव आणि ६ वर्षांची मुलगी दुर्वा जाधव या तिघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. एकाच घरातील तीन व्यक्तींचा असा करुण अंत झाल्याने संपूर्ण वाडीवर शोककळा पसरली आहे.
दोन निष्पाप बालकांची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात उपचार सुरू
या भीषण घटनेतून आशा जाधव यांची इतर दोन मुले सुदैवाने बचावली आहेत, मात्र विषबाधेमुळे त्यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि दोन्ही गंभीर मुलांना तातडीने माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या या दोन्ही बालकांवर अतिदक्षता विभागात वैद्यकीय उपचार सुरू असून, डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
सामूहिक आत्महत्येचे गूढ कायम; पोलिसांकडून तपास सुरू
आपल्या पोटच्या चार गोळ्यांना मृत्यूच्या दरीत ढकलून स्वतःचे जीवन संपवण्याइतके टोकाचे पाऊल आशा जाधव यांनी का उचलले? याचे ठोस कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. हा प्रकार घरगुती छळातून घडला, आर्थिक विवंचनेमुळे की यामागे इतर काही कौटुंबिक वाद होता, याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. माणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पथक सर्व बाजूंनी या घटनेचा सखोल तपास करत आहे.


