Rohit Pawar : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून आंदोलनाची धार दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. सरकारने कर्जमाफीवरील जाचक अटी मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. “मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलं आहे. तो माझ्यासाठी किंवा आमच्या कुटुंबासाठी आंदोलन करत नाही, तर राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उपोषणाला बसला आहे,” असे ते म्हणाले.
राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांनाही थेट आवाहन केले. “जोपर्यंत शेतकरी स्वतःच्या प्रश्नांसाठी उभा राहत नाही, तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही. आता घरात बसायचं की रस्त्यावर उतरायचं, याचा निर्णय शेतकऱ्यांनीच घ्यावा,” असे त्यांनी सांगितले.
पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आज विविध राजकीय पक्षांचे नेते, आमदार आणि खासदार रोहित पवार यांची भेट घेण्याची शक्यता असल्याने आंदोलनाला आणखी राजकीय वजन मिळण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे सातत्याने रोहित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. मात्र, आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांवर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने सरकार आणि आंदोलकांमधील कोंडी कायम आहे.
याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पंढरपूर दौऱ्याकडेही लक्ष लागले आहे. त्यांच्या समर्थकांनी आधीच आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, जरांगे पाटील प्रत्यक्ष भेट घेऊन रोहित पवारांना समर्थन देणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


